कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पिंपळनेर जवळील सामोडे येथील शेतकरी किरण घरटे यांनी आपला एक ट्रॅक्टर भर कांदा चक्क सामोडे ग्रामपंचायती समोर फेकून देत तीव्र निषेध व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर हा संपूर्ण कांदा त्यांनी नागरिकांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
या घटनेमुळे शेतकरी किती हवालदिल झाले आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. आधीच पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, आता कांद्यालाही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
किरण घरटे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला होता. त्यावेळी त्यांना 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल. अशी अपेक्षा होती. मात्र, काही कारणास्तव त्यांना तो कांदा विक्री करता आला नाही. त्यानंतर जेव्हा ते पुन्हा कांदा घेऊन बाजारात गेले, तेव्हा व्यापाऱ्यांनी त्यांना केवळ 600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल असे सांगितले. या दरातील मोठ्या घटीमुळे आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी वृत्तीमुळे किरण घरटे संतापले. ट्रॅक्टरचे 4000 रुपये भाडे आणि मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याने, त्यांनी शेवटी सामोडे ग्रामपंचायत समोर आपला संपूर्ण कांदा फेकून देण्याचा आणि नागरिकांना तो मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे.