मृग नक्षत्र संपत आले असले तरी अद्यापही गोंदिया जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, हवामान विभागानेसुद्धा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाचा अंदाज घेत पेरणी करत असल्याचे चित्र शेत शिवारात दिसत आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली आहे. मात्र सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.