कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनलगत असलेले एसटी स्टँड सध्या अक्षरशः उघड्यावर आहे. पावसाळ्यात छत्री नसेल तर प्रवाशांचे हाल होणं अटळ. बस स्थानकात मोठमोठे खड्डे, त्यात साचलेला चिखल, पाय घसरून पडणारे प्रवासी हे दृश्य रोजचेच झाले आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार,"महिलांसाठी टॉयलेट नाही, उभं राहायला शेड नाही, बस केव्हा येते याची माहिती देणारे स्पीकरही नाहीत. मग या स्मार्ट सिटीचा उपयोग काय?" कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवीन बस स्थानकाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना या बस आगारात तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महिलांना टॉयलेट नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पावसात चिखलातून वाट काढत बस पकडावी लागत असल्याने अनेकजण घसरत असून, कपडे चिखलाने खराब होत असल्याच्या तक्रारींनी एसटी स्थानकावर दररोज प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असते. यामुळे बस स्थानकावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्याना देखील प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सध्या प्रवासी वर्ग कडून पालिका आणि परिवहन खात्याकडे तात्काळ छप्पराची व्यवस्था करावी,महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट, स्पीकर व अलाउन्समेंट सिस्टीम आणि स्थानकाच्या रस्त्यावर सांडपाणी आणि चिखलावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.