Chhagan Bhujbal : महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबरला आणि खातेवाटप २१ डिसेंबरला झालं. या मंत्रिमंडळातून डावललं गेल्याने छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झाले आहेत. सोमवारीच छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातून सध्या विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. दरम्यान या सगळ्यामागे २००९ चा एक प्रसंग आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संघर्ष २००९ पासूनच सुरु झाला अशाही चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्याने याबाबत सांगितलं आहे. त्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.
जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधान छगन भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत काय चर्चा झाली? काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.