जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवून, स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपक्रम प्रमुख प्रा. अमोल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. पी. यु. शिंदे, श्रीमती एस. पी. आहेर, प्रा. प्रशांत देवरे, सुदय बोरसे, योगेश ठोके, आर. के. शिंदे, बी. जी. दुकळे यांच्यासह ३१ विद्यार्थीनी आणि ४९ विद्यार्थ्यांच्या समूहाने स्वच्छता अभियान राबविले.
● अविघटनशील कचऱ्याचे संकलन :
शिवनेरी गडावरील पायवाटा, महादरवाजा, परवानगीचा दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, फाटक दरवाजा, शिपाई दरवाजा, कुलुप दरवाजा या सात दरवाजांचा परिसर शिवाई देवी मंदिर, बालेकिल्ला, जिजाऊंचा वाडा (शिव जन्मस्थळ), जिजाऊ व बाल शिवाजी मूर्ती परिसर कडेलोट बिंदू, गंगा-जमुना पाण्याचे टाके आदी ठिकाणी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामे आवरणे, जेवणाच्या कागदी पत्रावळी, थर्माकोल सदृश अविघटनशील असा सात पोती कचरा गोळा करून गडाच्या पायथ्याशी आणून त्यांची सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावली. झाडांचा पालापाचोळा इतर कचरा गोळा करण्यात आला. गडावरील दगडांवर पर्यटकांकरुन टाकलेली नावे धुऊन, पुसण्यात आली. प्रसंगी वृक्षारोपण करुन वृक्षांना पालकत्वाचे बारकोड लावण्यात आले.
● विद्यार्थ्यांची सामूहिक वृक्षवंदना :
वृक्षप्रेम व वृक्षाप्रति कृतज्ञता व्यक्त करणेकामी मी हिरवांकुर मी पर्यावरण योध्दा या आशयाची 'वृक्षवंदांना' प्रा. अमोल अहिरे यांनी विद्यार्थ्यांकडून करुन घेतली. यावेळी चिंच, आंबा, नीम, जांभूळ, सुबाभूळ आदी भारतीय प्रजातींच्या वृक्षाची बीज चेंडू (सीड बाॅल) प्रति विद्यार्थी पाच या प्रमाणात वाटण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी माळरानावर सीड बाॅल टाकलेत. सदर पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमाची पर्यटकांनी प्रशंसा केली.
● विद्यार्थ्याच्या कलागुणांना मिळाला वाव :
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान प्राप्त व्हावे, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना गडकिल्ले पाहता यावेत, इतिहास, भूगोल कळावा, विद्यार्थ्यांना काहीसा विरंगुळा मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शाळा महाविद्यालयांकडून शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी सहल काढली जाते. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहलीतून गडकिल्ल्यांवर राबविलेल्या स्वच्छता अभियानतून सामाजिक संदेश दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी 'व्यवहारात राष्ट्रभक्ती' या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच समूह गीत, अभिनय गीत, पोवाडा, घोषणा, संकल्पमंत्र आदींचे सादरीकरण केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळाला.
● ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे...
■ गडावरील पायवाटा, झाडे-झुडपे, पाण्याचे टाके येथे पर्यटकांकडून फेकलेल्या रिकाम्या बाटल्या आढळतात. झाडांवर, येथील दगडांवर, भिंतींवर विविध प्रेमसंदेश तर दिसतातच त्या व्यतिरिक्त च्युईंगम चिकटवलेली झाडाची खोडेसुद्धा आढळून येतात.
■ पायवाटांवर, झाडाझुडपात फोडून टाकलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे स्थानिकांना, गुरांना व पर्यटकांना नाहक त्रास होतो. अर्धवट खाऊन टाकलेल्या पदार्थांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. यातून गडाचे पावित्र्य धोक्यात येते. शिवाय गडाचे विद्रूपीकरण होते.
■ विकृत मानसिकतेने पर्यटक कचरा, खाद्यपदार्थ, काचा तिथेच टाकून परतीच्या वाटेला लागतात. ही मानसिकता बदलली तरच गड-किल्ले स्वच्छ राहू शकतील व या ऐतिहासिक वारशाचे जतन होऊन गडाचे पावित्र्य टिकेल. मात्र त्यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.
प्रा. अमोल अहिरे, स्वच्छता अभियान प्रमुख