मोबाईलच्या हट्टापायी एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून वडिलाने देखील त्याचे दोरखंड सोडले आणि त्याच दोरखंडाने स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले. मन हेलावून लावणारी ही घटना जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी गावात गुरुवारी घडली. पिता पुत्राच्या आत्महत्येच्या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय ४३) आणि ओमकार राजेंद्र पैलवार ( वय १६) असं मयत पिता-पुत्राचे नाव आहे.
राजेंद्र पैलवार हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना तीन मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा हा आई वडिलांसोबत गावाकडे राहतो. तर ओमकार आणि त्याचा अन्य एक भाऊ उदगीर येथील शंकर माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेत शिक्षण घेत होते. ओमकार हा दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. मकर संक्रात सणानिमित्त राजेंद्र पैलवार यांची दोन्ही मुलं गावाकडे आली होती. यावेळी ओमकारने आपल्या वडिलांकडे मोबाईल घेऊन देणाचा हट्ट केला. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने वडिलाने त्यासाठी नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात ओमकार हा घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेण्यात आला.
त्याचा शोध घेत असतानाच गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांना धक्काच बसला. जड अंतःकरणाने वडिलाने मुलाच्या गळ्यातील दोरखंड सोडले आणि काही वेळातच त्याच दोरखंडाने गळफास घेऊन राजेंद्र यांनी आपले जीवन संपवले. पिता पुत्राच्या दुहेरी आत्महत्येमुळे पैलवार कुटुंबीयावर दुःखाच डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. या प्रकरणी बिलोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.