छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेवराई शाखेसमोर समोर एका वधू पित्याने पैसे मिळत नसल्याने आत्महत्या केल्यावर पुन्हा एकादा बँकेच्या खातेदाराला ठेवीचे पैसे मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुरेश आत्माराम जाधव यांनी मल्टिस्टेटमध्ये ठेवलेले पैसे न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. मल्टिस्टेटमध्ये जाधव यांचे ठेवीचे ९ लाख रुपये अडकले होते. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. फी भरता आली नाही, म्हणून मुलगी लातूर येथून अर्धे शिक्षण सोडून आली होती, तर मुलगा शुभम हा बारावी पास होऊन क्लास करत होता. दोघांनाही डॉक्टर करायचे होते. मात्र, मल्टिस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले नऊ लाख रुपये शिक्षणासाठी मिळावेत, यासाठी दोन वर्षांपासून चकरा मारल्या. परंतु, पैसे मिळाले नाहीत. या त्रासाला कंटाळून सुरेश जाधव यांनी मल्टिस्टेटसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली.